भारत - आसियान सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२-सूत्री प्रस्ताव सादर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता इथं झालेल्या आसियान-भारत शिखर संमेलन आणि पूर्व आशिया शिखर संमेलनात सहभागी झाले होते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी आज पहाटे ते जकार्ताला पोहोचले. त्यांनी २० व्या आसियान शिखर संमेलनाला संबोधित केलं. आसियान मॅटर्स- एपिकसेंट्रम ऑफ ग्रोथ ही यंदाच्या आसियान शिखर संमेलनाची संकल्पना आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारत - आसियान सहकार्य बळकट करण्यासाठी १२-सूत्रांचा प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावात दळणवळण,डिजीटल परिवर्तन, व्यापार आणि आर्थिक प्रतिबद्धता, समकालीन आव्हानांना तोंड देणं, लोक-लोक संपर्क आणि धोरणात्मक प्रतिबद्धता वाढवणं यांचा समावेश आहे.
दक्षिण-पूर्व आशिया-भारत-पश्चिम आशिया-युरोप यांना जोडणारा मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक कॉरिडॉर स्थापन करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी मांडला. भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आसियानमधील भागीदारांना देण्याचा प्रस्तावही प्रधामंत्र्यांनी यावेळी मांडला. डिजिटल भविष्यासाठी आसियान-इंडिया फंडाची घोषणा ही प्रधानमंत्र्यांनी केली. यामाध्यमातून डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक प्रतिबद्धता सहकार्यावर लक्ष केंद्रित करणं, गुंतवणूक वाढवण्यासाठी भागीदार म्हणून काम केलं जाईल. असंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, आसियान-भारत संबंधांचं हे चौथं दशक आहे आणि अशा वेळी हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर गेल्यामुळं या संबंधांना नवे आयाम प्राप्त झाले आहेत.आसियान संमेलनाचं आयोजन केल्याबद्दल इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको-विदोदो यांचेही प्रधानमंत्री मोदी यांनी आभार मानले.
आपल्या भाषणात प्रधानमंत्री मोदी यांनी आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणातील मध्यवर्ती स्तंभ आहे. तसंच भारताच्या हिंद-प्रशांत महासागर धोरणातही त्याचे महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. सध्या जगात अनिश्चित असं वातावरण असूनही भारत-आसियानमधील परस्पर सहकार्यात सातत्यानं वृद्धी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जकार्तामधील दिली तिमोर लेस्ते इथं भारतीय दुतावास सुरू करणार असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.या नंतर प्रधानमंत्र्यांनी मायदेशी प्रयाण केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.